नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे साखळी उपोषण केले. गेले चार आठवडे शेतकऱ्यांचे दिल्ली परिसरात हे आंदोलन सुरू असून ते संपण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत.
स्वराज पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी या उपोषणाच्या समर्थनासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी उपोषण आयोजित करावे असे आवाहन केले होते. त्यालाही काहीं राज्यांमध्ये प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान दिल्लीकडे जाणारे अन्य रस्तेही काही प्रमाणात आंदोलक शेतकऱ्यांनी बंद केल्याचे वृत्त असून तेथील वाहतुकीच्या संबंधात स्थानिक पोलिसांनी नवीन सूचना नागरीकांना देऊन पर्यायी मार्गांची माहिती समाज माध्यमांवर दिली आहे.
या आंदोलनाच्या ठिकाणी आजही पुर्ण शांतता आणि शिस्त बाळगली गेली. त्यामुळे तेथे कोणताहीं अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.