सुरेश डुबल
गल्ला भरण्यासाठी प्रदर्शनाला व्यावसायिक स्वरूप; ओळख पुसण्याचा प्रयत्न
कराड – शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले प्रदर्शन अशी कराडच्या प्रदर्शनाची ओळख. यंदा या बाजार समितीच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी कमी, अन् व्यावसायिकांना जास्त स्टॉल देण्यात आले आहेत. या कारणानेच बाजार समितीने गल्ला भरण्यासाठी उभारलेला इव्हेंट म्हणजे कृषी प्रदर्शन अशी नवीन ओळख यंदा तयार झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर बाजार समिती चालते त्यांनी शेतकऱ्यांना बाजूला केल्याचे दिसत आहे.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या सोळा वर्षांपासून बाजार समिती शेतकऱ्यांसाठी चार दिवसीय प्रदर्शन राबवत असते. यामध्ये पीक स्पर्धापासून ते फळे-फुले स्पर्धा, गाई-म्हशी स्पर्धा तसेच पशु-पक्षी स्पर्धा घेतली जातात. याच जोडीला शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य तसेच त्यांनी सेंद्रिय शेतीतून तयार केलेली फळे-फुले, गूळ, काकवी यासह जीवनावश्यक वस्तूंसाठी प्रदर्शनात स्टॉल देण्याची प्राथमिक जबाबदारी बाजार समितीची आहे. याआधीच्या प्रदर्शनात याचे पालनही झाले. यंदा मात्र शेतकऱ्यांना बाजूला ठेवत बाजार समितीला व्यापारीदृष्ट्या जास्तीत जास्त कसा फायदा होईल, याचे योग्य नियोजन बाजार समितीच्या संचालक मंडळांनी केले आहे.
सध्या सुरू असलेल्या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांचे स्टॉल शोधावे लागत आहेत. याउलट कमर्शियल स्टॉल हे व्यापाऱ्यांना विकले गेले असून, त्यातून बक्कळ पैसा बाजार समिती कमवत आहे. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच असलेल्या स्टॉलमध्ये दुचाकी गाड्यांची विक्री चालू आहे. त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा या म्हणीचा इथे तंतोतंत अनुभव येतो.
या आधी काही वर्षे कृषीप्रदर्शनाचे काम इव्हेंट मॅनेजमेंटला दिले होते. त्यातून त्या इव्हेंट मालकाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांसाठी सहलीही फ्रीमध्ये देऊ केल्या होत्या. त्यामुळे या संचालकांना याची चटक लागली की काय? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना सताऊ लागला आहे आहे.
यंदाचे प्रदर्शनाचे सोळावे वर्ष आहे. गेली पंधरा वर्षे हे प्रदर्शन शेतकरी हिताचे राहिले होते. त्यामुळे प्रदर्शनाची ख्याती दूरवर पोहोचली होती. यंदा, पंधरा वर्षात कधी नव्हे एवढे शेतकरी या प्रदर्शनापासून नामानिराळा राहिल्याचे दिसत आहे.हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी असल्याने येथे जिल्हा परिषद कृषी विभागासह शासकीय विभाग प्रदर्शन ठिकाणी येत असतात. शेतकऱ्यांना नवनवीन माहिती मिळते. याऊलट बाजारसमिती स्वतःच्या फायद्यासाठी या शेतकऱ्यांचा वापर करून घेत असेल, तर चांगले चाललेल्या या प्रदर्शनाला गालबोट लागल्याशिवाय राहणार नाही. जर का असे झाले तर प्रशासनही या प्रदर्शनातून अंग काढून घेईल व हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांचे न होता व्यावसायिकांचे होऊन बसेल.