बंगळूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय दौऱ्यासाठी दाखल होण्याआधी कर्नाटकात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची धरपकड करण्यात आली. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी झाली नसल्याचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्याच्या तयारीत शेतकरी होते.
शेतकरी नेते कोदीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बंगळूर, तुमकुरूसह विविध भागांत निदर्शने करणार होते. मात्र, चंद्रशेखर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना विविध भागांतून पोलिसांनी ताब्यात घेतले. सुटकेनंतर चंद्रशेखर यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. कलम 370, राम मंदिर आदी अजेंडा भाजपकडून राबवला जाऊ शकतो. मात्र, त्या पक्षाकडून कृषि क्षेत्राशी संबंधित स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याबाबत हात आखडता घेतला जातो. त्यासंबंधीच्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करून भाजपने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला.