जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पीक मातीमोल; शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होईना
नगर – पावसाळा संपल्यानंतर ऐन सुगीच्या दिवसात महिनाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी या पिकांचे उत्पादने बुडाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या अवकाळी पावसाने हिरावला. जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणी नुसार जिल्ह्यात 3 लाख 64 हजार 14 हेक्टर क्षेत्रवरील पिकांचे नुकसान झाले.
या नुकसानीमुळे पीक लागवडीसाठी केलेला खर्च न निघाल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. यावर्षीचा पावसाळा होऊन महिना संपल्यानंतर परतीचा पाऊस सुरू झाला. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील परतीच्या पावसाने कापणीला आलेल्या किंवा कापलेल्या पिके सडले असून कुजु लागले. सोयाबीन, बाजरी, कपाशी यासह मका, ऊस, कांदा, भात या पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन जागच्या जागी सडू लागले.
जिल्ह्याते कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकरी करीत आहेत. याची फारच तोकडी आर्थिक मदत मिळालेली आहे. मागील वर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र या कर्जमाफीचा फायदा अद्याप मिळालेला नाही. अशा परिस्थितीत या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक हिरावले.
दिवाळीच्या तोंडावर शेतातील खरीप पिकांची कापणी होऊन शेतकरी या पिकांची साठवणूक केली, तर कापणी न झालेल्या शेतकऱ्यांची पिके यावेळी शेतात उभी होती. अशा परिस्थितीत अचानक अवकाळी पावसाने जोरदार सुरू केल्यामुळे शेतातील उभे पीक खराब झाले आणि कापणी होऊन लावून ठेवलेले पीक शेतात पाणी साठल्यामुळे भिजले. त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पार खचून गेला आहे. त्याला उर्जीतावस्था येण्यासाठी शासनाने पिकविमा माध्यमातून मदत करण्याची मागणी सर्व जण करत आहेत.
पीक लागवडीचा एकरी खर्च
यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस सुरू असल्याने पीक लागवडीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच कीटकनाशकाचे भाव वाढले. नांगरणी, वखरणी, बी-बियाणे, पेरणी, फवारणी, निंदण, कापणी त्यांचा खर्च वाढला. सोयाबीनच्या लागवडीवर एकरी 18 ते 20 हजार रुपये खर्च येतो. कपाशीच्या पिकाच्या लागवडीवर एकरी साधारणतः 25 हजार रुपये खर्च येतो. कांद्याच्या लागवडीवत एकरी खर्च 35 ते 40 हजार रुपये खर्च आहे, तर ज्वारीच्या पिकावर एकरी खर्च 8 ते 9 हजार रुपये आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी आक्टोबरपर्यंत कशीबशी पिके सांभाळली. मात्र, परतीच्या पावसाने पिकांची पूर्ण नासाडी केली. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही. यामुळे पिकाच्या नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मिळणाऱ्या मदतीकडे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आस लागलेली आहे.