नगर -कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी भागातील गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले, अशा आशयाच्या विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वार्तांमुळे ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हॉटेलिंग, मल्टिप्लेक्स, चैनीच्या वस्तू, पेट्रोल, डिझेल आदींच्या भाववाढीवर चकार शब्द न बोलणाऱ्या शहरी नागरिकांचे नेमके कांद्याचे भाव वाढल्यावरच आर्थिक बजेट कसे कोलमडते, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया दिल्या जात असून, शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी दुष्काळामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई होती. पावसाला उशीर झाल्यामुळे खरीप पिकांच्या लागवडीला उशीर झाला. यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीला देखील उशीर होऊन कांदा पिकाला अंतिम टप्प्यात पाणी देताना पाणीटंचाई निर्माण होऊन पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला कांदा अनेक शेतकऱ्यांना सोडून द्यावा लागला व शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.
मजूर टंचाईमुळे शेतातून कांदा वेळेवर काढला गेला नाही. मात्र, जेव्हा कांद्याला थोडाफार भाव मिळतो. तेव्हा शहरातील गृहिणींचे बजेट कांद्यानेच का कोलमडते, असा सवाल शेतकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन देखील केले आहे. गेल्यावर्षी कांदा लागवडीसाठी व काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने परवडत नसतानादेखील नाइलाजाने इतर ठिकाणाहून मजूर आणावे लागल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. मजुरीचे पैसे देण्यासाठी कांद्याचे दर कोसळलेले असताना तोटा खाऊन अनेक शेतकऱ्यांना कांदे विकावे लागले होते.