श्रीगोंदा – परिवर्तनाच्या नावाखाली ज्यांना तालुक्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले. त्या विद्यमान लोकप्रतिनिधींना घोड, विसापूर, कुकडीच्या पाण्याचे गेल्या पाच वर्षांत नियोजन करता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यांना मत मागण्याचा अधिकारी नाही, अशी टीका मिलिंद दरेकर यांनी केली.
भानगाव येथे विक्रमसिंह पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी संदीप नागवडे, संतोष इथापे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडणुकीत सुद्धा कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न निवडणुकीचा मुद्दा करून घोड पट्ट्यातील उमेदवार कुकडीच्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही, असा विखारी प्रचार विरोधकांनी सुरू केला असला, तरी कुकडी लाभधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडून पाच वर्षांपूर्वी केलेली चूक पुन्हा करू नये, असे आवाहन दरेकर यांनी केले.
कुकडी, घोड व विसापूरच्या पाण्याचं नियोज नपाचपुतेच करू शकतात, हे जनतेच्या लक्षात आले आहे. ज्या लोकप्रतिनिधीने तालुक्याचे वाळवंट केले, त्यांच्याच नेतृत्वाखाली आता राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात असल्याने ते तरी भविष्यात काय दिवा लावणार, याचा अभ्यास करावा, असा टोलाही दरेकर यांनी शेवटी बोलताना लगावला.