इस्लामपूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर १५ मे रोजी ‘अंगण हेच माझे आंदोलन’ असे अनोखे आंदोलन पुकारण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि विविध प्रश्नांवर हे आंदोलन करणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत आंदोलनामध्ये राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबानी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, ” कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना सर्व पातळ्यांवर मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.
गेली दहा दिवस रोज राज्यातील कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. येत्या शुक्रवारी १५ मे रोजी राज्यभर हे आंदोलन होईल. कोरानामुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे. त्यामुळे सध्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हे अनोखे आंदोलन होत आहे.
यात प्रामुख्याने; शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करावा, आधारभूत किंमतीने शेतीमाल खरेदी करावा किंवा प्रति क्विंटल १ हजार रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात यावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी देण्यात यावी, दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्यावे, कोरोनामुळे फळ-भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, याच बरोबर रेशनकार्ड नसणाऱ्या कामगार, शेत मजूरांना मोफत धान्य आणि २ हजार रुपये भत्ता देण्यात यावा, शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे.
आपल्या कुटुंबासह अंगणातच उभे राहुन सोशल डिस्टन्सिंग पाळून आंदोलनात सहभागी व्हावे, यावेळी आपल्या मागण्यांचे फलक घेत हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन खोत यांनी केले आहे.