नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दिल्लीत झालेल्या हिंसाचारात एक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर आता अनेक शेतकरी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.
ट्रॅक्टर रॅलीनंतर शेतकरी आंदलोक बेपत्ता असल्याचा बातम्या समोर येत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीत भाग घेण्यासाठी दिल्ली येथे गेलेले पंजाब मधील १०० हून अधिक शेतकरी पंजाब मानवाधिकार संघटनेच्या म्हणण्यानुसार ‘बेपत्ता’ आहेत. खलरा मिशनच्या सहकार्याने, पीएचआरओने लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या आंदोलकांना सोडवण्यासाठी कायदेशीर मदत देणार असल्याची घोषणा केली.
पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाचे वकील हकाम सिंह म्हणाले की, पंजाबमधील किमान ८०-९० तरुण सिंघू आणि टिकरी येथे त्यांच्या आंदोलनस्थळी परत आले नाहीत. “वकीलांचा एक गट त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही पोलीस, फार्म युनियन आणि हॉस्पिटल यांच्या संपर्कात आहोत, असं ते म्हणाले.