चंदीगड – कॉंग्रेस व अकालीदल यांसारख्या पक्षांकडून शेतकऱ्यांचे आंदोलन हायजॅक केले जात आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी केला आहे. या पक्षाकडून शेतकऱ्यांविषयी खोटा कळवळा दाखवला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
ते म्हणाले की, लखीमपूरला जी घटना घडली त्या प्रकरणात योगी सरकारने संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाच्या न्यायिक चौकशीसाठी आयोगही स्थापन करण्यात आला आहे. असे असताना त्यावरून मोठा गहजब माजवून शेतकऱ्यांचे आपणच पाठीराखे असल्याचा देखावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
लखीमपूरला जे काही घडले तो कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे आणि त्यावर योगी सरकार प्रभावी उपाय योजत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या पाठीशी योगी सरकार खंबीरपणे उभे राहिले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.