लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारच्या महत्त्वाकांक्षी ट्रान्सगंगा प्रकल्पाच्या ठिकाणी भरपाईची मागणी करत सुमारे पाच-सहाशे शेतकऱ्यांनी तोडफोड केली. तेथे राखीव पोलिस दल आणि 13 पोलिस ठाण्यातील कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, या आंदोलनात एक जेसीबी, बस आणि मोटारींची तोडफोड करण्यात आली. कामावर आलेल्या मजुरांनाही मारहाण करून काम बंद पाडण्यात आले.
शेतकरी नेते हरेंद्र निगम आणि सुरेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पाचे मुख्य अभियंता संदीफ चंद्रा यांना घेराव घालण्यात आला. त्यांच्यासमोरच कामासाठी आलेल्या मजुरांना हुसकावून लावण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटना स्थळावरून काढता पाय घेतला. त्या पाठोपाठ शेतकऱ्यांनी या प्रकल्पालाच वेढा घातला. मोठ्याप्रमाणावर तोडफोड सुरू केली. त्यानंतर तेथे पोलिस आणि राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या प्रकल्पात घुसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी बाहेर हुसकावल्यावर या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. दरम्यान, शनिवारपासून काम सुरू करायचे होते. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ते सुरू होऊ शकले नाही, अशी माहिती मुख्य अभियंता संदीप चंद्रा यांनी सांगितले.