शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली
निमसाखर – निमसाखरलगतच्या शेळगाव ओढ्यात वालचंदनगरलगतच्या एका प्रकल्पाने रसायनमिश्रित पाणी पाटबंधारे खात्याला निवेदन देऊनही रात्री ओढ्यामध्ये सोडले जात आहे. त्यामुळे शेती, जनावरांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिक आणि सामाजिक संघटनांनी दिला आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना नीरा नदीमुळे मोठा फायदा झाला आहे. ठिकठिकाणच्या नीरेवरील बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठते. त्यामुळे नदीकाठच्या आठ किलोमीटरपर्यंतच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. याचबरोबर नदीकाठच्या गावांना नदीतील पाण्याच्या पाझरमुळे पिण्याच्या सार्वजनिक विहिरी, खासगी बोअरवेलवर नागरिक अवलंबून आहेत.
काही दिवसांपासून रणगाव हद्दीतील प्रकल्पातून शेळगाव ओढ्यात रसायनयुक्त पाणी सोडले जात आहे. हे दूषित पाणी सोडण्यास नागरिकांचा विरोध आहे. यासाठी निमसाखर ग्रामपंचायतीकडून पत्र दिले जाणार आहे. तरीही हा प्रकल्प ठोकशाहीने पाणी सोडत आहे.