पुणे – अलीकडे समाजातील परिस्थिती बदलली आहे. गरीब-श्रीमंत दरी वाढत आहेत. महिला अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. शेतकरी, कामगार यांनाही न्याय मिळत नाही, अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी केली.
प्रस्तावित कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, महात्मा फुले कामगार संघटना, मार्केटयार्ड टेम्पो संघटना, महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन या सर्व संघटनांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.
त्यावेळी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट, राजेंद्र चोरघे, कामगार युनियनचे संतोष नांगरे, हमाल पंचायतीचे गोरख मेंगडे, पथारी संघटनेचे बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते.