नवी दिल्ली – कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या धरून बसले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले असून आंदोलक शेतकरी दिल्लीच्या राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर राडा घालताना दिसतायेत. ( Farmer Tractor Rally )
दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेल्या या आंदोलक शेतकऱ्यांवर आता आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्यांचेही नियंत्र राहिलं नसल्याची चर्चा आहे. अशातच आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
टिकैत यांनी याबाबत बोलताना, ‘आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या लोकांची ओळख आम्ही पटवली आहे. हे लोक राजकीय पक्षांशी निगडित असून आंदोलनाला बदनाम करणं हाच त्यांचा हेतू आहे. असा गंभीर आरोप लगावला. ( Farmer Tractor Rally )
आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर?
दरम्यान, टिकैत यांना आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेलं आहे काय? असा प्रश्न विचारला असता त्यांनी, “आम्ही सर्व जण शांतिपूर्वक मार्गाने चाललो आहोत. जे शांतीपूर्ण आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करतायेत असे लोक चरित्रहीन आहेत. हे लोक राजकीय पक्षांशी निगडित असून त्यांना आंदोलन बदनाम करायचं आहे.”
दिल्लीत उफाळलेल्या हिंसेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये असे आव्हान दिल्ली पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. उफाळलेल्या हिंसेमध्ये एका शेतकरी आंदोलकाचा मृत्यू झाल्याचे देखील वृत्त असून हिंसक वळण लागलेल्या भागात इंटरनेट सुविधा बंद करण्यात आल्या आहेत.