बीड – कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडवणी तालुक्यातील देवडी गावात घडली आहे. आसाराम दत्तू सांगळे (वय 44), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पाच दिवसांपूर्वीच सांगळे यांनी आपल्या मुलीचे लग्न लावले होते. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
सततच्या नापिकीमुळे सांगळे यांच्यावर कर्ज झाले होते. अशातच मुलीचा विवाह करण्यात आला. त्यानंतर मुलीच्या लग्नाला झालेला खर्च आणि पुर्वीचे कर्ज कसे फेडावे? या चिंतेत ते राहत होते. गावातील काही लोकांच्या म्हणण्यानुसार, मी कर्ज कसे फेडू आणि संसाराचा गाडा कसा चालवू? माझे कसे होणार? असे ते सारखे म्हणत होते. या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी काल शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले असल्याचे सांगितले जात आहे. विषारी औषध घेतल्याचे मसजताच कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई- वडील, चार भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.