नवी दिल्ली – मुलगा कोणाचे ऐकणार नाही पण आईचं ऐकतोच, त्यामुळे तुम्हीच आपल्या लेकाला हे वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यायला सांगा… ही विनंती केली आहे खूद्द पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या मातेला. पंजाबमधील एका शेतकऱ्याने पत्र पाठवून ही हृदयद्रावक साद घातली आहे.
मी अत्यंत जड अंत:करणाने हे पत्र लिहीत आहे. तुम्हाला माहीत असेल, जगाला आणि देशाचा अन्नदाता आज दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपला आहे. त्यात 90 -95 वर्षांचे वृध्दही आहेत. मुले आहेत, महिलाही आहेत. या गारठ्याने लोक आजारी पडत आहे. त्यातले काही जण शहीदही झाले आहेत, ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे, असे पंजाबच्या फिरोझपूर जिल्ह्यातील सरप्रितसिंग यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेकडो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत आहेत. या शेतकऱ्यांनी मोदी यांची आई हीराबेन मोदी यांनाच आता साकडे घातले आहे. अदानी, अंबानी आणि अन्य मोठ्या भांडवलदारांच्या आज्ञेवरून मंजूर झालेला हे तीन काळ्या कायद्यांमुळे चिंतीत होऊन दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे.
मी मोठ्या आशेने हे पत्र लिहीले आहे. तुमचा मुलगा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते हा मंजूर झालेला कायदा मागे घेऊ शकतात. मला आशा आहे माणूस आई सोडून कोणालाही नाकारू शकतो. जर तुम्ही तुमच्या मुलाला आदेश दिलेत तर सारा देश तुमचा उपकृत होईल, असे त्यात म्हटले आहे.