लखनौ – उत्तरप्रदेशात पुढील काही दिवसांत विविध शेतकरी पंचायतींचे आयोजन करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोरा जाणारा उत्तरप्रदेश ढवळून काढण्याची रणनीती शेतकरी आंदोलकांनी आखल्याचे सूचित होत आहे. उत्तरप्रदेशात 18 विभागीय मुख्यालये आहेत. त्या सर्व ठिकाणी शेतकरी पंचायती होणार आहेत.
त्यामुळे केंद्रात आणि उत्तरप्रदेशात सत्तेवर असणाऱ्या भाजपची कोंडी करण्यासाठी शेतकरी आंदोलक सरसावल्याचे मानले जात आहे. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी जवळपास दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चा करत आहे. त्या मोर्चाने आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशातून निवडणुकांना सामोरी जाणारी राज्ये ढवळून काढण्याचे धोरण अवलंबले आहे.