चिंबळी – कधी उन्ह, तर कधी पाऊस यामुळे वातावरण दूषित झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने महागडी औषधीची फवारणी करुनही रोगराई नष्ट होत नसल्याने त्याचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे खेड तालुक्यातील दक्षिण भागतील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
खरीप हंगामातील कमी खर्चात व थोड्या अवधीत निघणारे पीक म्हणजे सोयाबीन. त्यामुळे कुरुळी, चिंबळी परिसरातील शेतकऱ्यांनी दोन अडीच महिन्यांपूर्वी या पिकाची मोठ्याप्रमाणत लागवड केली. त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे हे पीक तरारले होते. मात्र, मध्यतरी पडलेल्या कडक उन्हामुळे व त्यानंतर पुन्हा पाऊस आणि आता पुन्हा उन्ह या विचित्र वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी महागातली औषधांची फवारणी पिकांवर करीत असूनही प्रादुर्भाव कमी होत नसल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.