श्रीगोंदा – त्रिदिवसीय कृषी महोत्सवाची आज उत्साहात समाप्ती झाली. या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरला तो नेवासा येथील अश्व. नानासाहेब शेंडे यांच्या या अश्वावर छत्रपती शिवाजी महाराजांची नैसर्गिक मुद्रा आहे. या अश्वासोबत 30 ते 35 हजार शेतकऱ्यांनी फोटो काढल्याची माहिती शेंडे यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलतांना दिली.
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने व आमदार बबनराव पाचपुते यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज दुपारी शेतकऱ्यांना लिंबू, डाळिंब व आधुनिक शेती विषयी तज्ज्ञांचे व्याख्यान झाले.
श्रीगोंदा परिसरातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी आपला माल या प्रदर्शनात ठेवला होता. ऍड ऋषिकेश गायकवाड यांची मिरची व कलिंगड, येळपणे येथील संदीप वीर यांचे रंगीत कोबी फ्लॉवर, जळगाव येथील संत जगनाडे महाराज महिला बचत गटाचे खमंग पापड व गुळाची चिक्की, नंदकुमार ताडे यांची मटण दम बिर्याणी यांसह विविध कृषी वस्तूनी या प्रदर्शनाचा उत्साह वाढविला.
बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. यापुढे नावीन्यपूर्ण गोष्टी श्रीगोंद्यात आणण्यासाठी बाजार समिती प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाबळे, विजय शेलार, विशाल सकट आदींनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.