नवी दिल्ली – केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांचे नेतृत्व राकेश टिकैत करत आहेत. टिकैत हे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आहेत. गेल्या काही काळापासून आपल्या वक्तव्यांमुळे ते सातत्याने चर्चेत आहेत. मोदी सरकार विरूध्द त्यांनी जोरदार आघाडी उघडत ठिकठिकाणी किसान महापंचायत घेण्याचा धडाकाही लावला आहे. सोशल मीडियावरही ते सक्रिय झाले असून तेथे ट्वीट करत असतात. मात्र या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला सुरू झाला असून त्यांची खिल्ली उडवली जाण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत.
केंद्रात कोणतेही सरकार राहीले नसून काही व्यापारीच देश चालवत असल्याचा आरोप त्यांनी ट्वीटरवर केला. सरकारनेही अनेक उद्योग या व्यापाऱ्यांना विकल्याची टिप्पणीही टिकैत यांनी केली. त्यावरून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होतो आहे. जगात कोणता असा देश आहे जो व्यापारावर चालत नाही त्याचे उत्तर अगोदर द्या अशी विचारणा त्यांना करण्यात आली आहे. व्यापारामुळेच रोजगार मिळतो अन अन्नही मिळत. तुमचाही मोठा व्यापार आहे. त्याबाबतही बोलत जा. तुम्ही शेतकऱ्यांना रस्त्यावर बसवले आहे आणि स्वत: हॉटेलात राहत आहात, कधी त्याबद्दलही बोलत जा, असेही त्यांना सुनावण्यात आले आहे.
आंदोलनाच्या टप्प्यात टिकैत यांनी कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर आपण आत्महत्या करू असा इशारा दिला होता. त्या आघाडीवर नवीन काही अपडेटस् आहेत का अशी खोचक विचारणा काही जणांनी केली आहे. दरम्यान, देशात बेरोजगारी आणि भूकबळी वाढल्याच्या टिकैत यांच्या ट्विटवरही निशाणा साधण्यात आला आहे. शेतकऱ्यांना तुम्ही आंदोलनाला बसवले असल्यावर भूकबळी वाढणारच आहे असे नमूद करताना तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात हेही लक्षात ठेवा असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.