बेल्हे (पुणे) – जय जवान जय किसान म्हणवणाऱ्या आपल्या भारत देशात आजच्या घडीला बळीराजावर वाईट वेळ आली आहे; पण काळी आईच आपले सर्वस्व मानणारा बळीराजा कितीही संकटे आली तरी ताठ मानेने काळ्या आईची सेवा करीत आहेत.
बळीराजाचे शेतीवर असलेले प्रेम किंचितही कमी नसल्याचे तो आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवून देतो. कांदळी गावातील अशाच एका शेतकरी कटुंबातील नवरदेवाने लग्नमंडपात थेट ट्रॅक्टरवरून वधूसोबत एन्ट्री घेतल्याची एकच चर्चा गवात अन् समाज माध्यमावर रंगली आहे.
14 नंबर येथील दिगंबर कारभारी भोर यांचा मुलगा आकाश याचा विवाह रांजणी (ता. आंबेगाव) येथील बाळू वाघ यांची मुलगी आश्विनीबरोबर 14 नंबर येथील राहत्या घरी पार पडला. भोर कुटुंब हे शेतकरी कुटुंब असून आपल्या शेतीबरोबरच त्यांचा शेती मशागतीचा ट्रॅक्टर व्यवसाय आहे.
विवाहासारख्या आनंदाच्या क्षणी आपल्या व्यवसायाला न विसरता वधूला लग्नमंडपात आकाशने ट्रॅक्टरवरून आणले. ही आपल्या व्यवसायाशी असणारी एकनिष्ठता असल्याचे सरपंच विक्रम भोर यांनी सांगितले. आकाश याची इच्छा होती की, मला माझ्या होणाऱ्या पत्नीला लग्नमंडपात स्टेजवर माझ्यासोबत ट्रॅक्टरवर बसवून घेऊन जायचे आहे, अशी संकल्पना त्याने मांडली आणि त्याचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य अनिल भोर आणि त्यांचे सहकारी यांनी केले.
शेतकरी सुद्धा ठरवले की आपली इच्छा पूर्ण करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. या अनोख्या दमदार एन्ट्रीमुळे परिसरात या विवाहाची चांगलीच चर्चा होत आहे.