लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विवादित कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारने आणलेल्या या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या वर्षभरापासून लढा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता भाजपचे खासदार वरून गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच त्यांनी पंतप्रधानांकडे काही मागण्या देखील केल्या आहेत.
वरून गांधींच्या पत्रातील महत्वाचे मुद्दे
– कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत.
– जर हा निर्णय या पूर्वीच घेण्यात आला असता तर ७०० हून अधिक निरपराध शेतकऱ्यांचे जीव वाचवता आले असते.
– कृषी कायद्याविरोधात लढा देत असताना शहीद झालेल्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी. पंतप्रधानांनी स्वतः या मृत्यूंबाबत शोक व्यक्त करावा.
– आंदोलनातील शेतकऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीपोटी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
– लखीमपूर खेर येथे घडलेली घटना आपल्या लोकशाही व्यवस्थेवरील काळ डाग असून याप्रकरणाशी संबंधित असलेल्या केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. यामुळे तपास प्रक्रिया निष्पक्ष होईल.
– पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करून तणाव निर्माण केला. ३ ऑक्टोबरला लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चढवून ५ शेतकऱ्यांचा खून ही याचीच परिणीती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी लखनौ दौऱ्यावर आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी यांनी गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत मंचावर विराजमान होऊ नये. मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली.
केंद्रीय गृहराज्य मंत्री असलेले अजय मिश्रा हे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याचे वडील आहेत. आशिष मिश्रा सध्या अटकेत असून त्याच्यावर आंदोलक शेतकऱ्यांवर गाड्या चढवल्याचा आरोप आहे.
मिश्रांवर कारवाईची मागणी करणारे वरून गांधी पहिलेच भाजप नेते
दरम्यान, भाजप खासदार असलेले वरून गांधी हे गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे पहिलेच भाजप नेते ठरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वरून गांधी हे भाजपविरोधी भूमिका घेताना दिसत असून उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ते भाजपसाठीच घटक ठरू शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवतायेत.