रावणगाव, मळद, स्वामी चिंचोलीतील शेतकरी मेटाकुटीला
रावणगाव (वार्ताहर) –सध्या रब्बी हंगाम सुरू असून, शेतामध्ये विविध प्रकारच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतातील विविध कामांना मजुरांच्या आवश्यकता आहे; परंतु सगळीकडेच शेतातील कामे सुरू असल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांचा तुटवडा भासू लागला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली (ता. दौंड) अशा अनेक गावांतील शेतामध्ये कामांची लगबग सुरू आहे. यामध्ये ज्वारी काढणे, पिकांना पाणी देणे, गहू-ऊस खुरपणे, खत घालणे, औषध फवारणी, कांद्याची पात कापणे, कांदा विरळणे-काढणे अशा विविध कामांसाठी मजुरांची गरज लागते. या मजुरांची संख्या मोजकीच असल्याने आणि परिसरात सर्वत्र विविध कामे चालू असल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे.
शेतातील या कामांना उशीर झाला तर पिकांचे नुकसान होते. अशा वेळी मजूर मुद्दाम शेतकऱ्यांची अडवणूक करून जादा मजुरी मागतात त्यातच काही गावांमध्ये मजुरांची संख्याच कमी असल्याने आजूबाजूच्या गावांतून वाहन भाड्याने करून मजुरांना सकाळी कामावर आणावे लागते व संध्याकाळी पुन्हा त्यांना घरी सोडावे लागते त्यामुळे खर्चात वाढ होते. अशा वेळी शेजारील गावातून मजूर आणण्यासाठी सकाळी एक व संध्याकाळी एक तास वेळ जात असल्याने काम सुरू करायला एक तास उशीर व सुटी होताना एक तास त्यांना लवकर सोडावे लागते.
दिवसेंदिवस मजुरी वाढत आहे. पुरुष मजूर दिवसाला 400 ते 500 रुपये व स्त्री मजूर 200 ते 300 रुपये हजेरी मागतात. त्यासाठी अडून बसतात. शेतातील कामे उरकणे महत्त्वाचे असल्याने आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी नाइलाजाने जादा हजेरी देऊन कामे करावी लागत आहेत. कुरकुंभ, बारामती येथे एमआयडीसी असल्याने बरेच मजूर अशा ठिकाणी कामावर जातात, त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे.
पोपटराव लांडगे, कृषी व्यवस्थापक, मळद
लहरी हवामानामुळे पिकांवर विविध रोग व किडी आलेल्या असतानाच शेतमजुरांचा तुटवड्याची समस्या निर्माण झाली आहे. दररोजच्या कामासाठी आम्हांला टेम्पो भाड्याने करून शेतातील कामासाठी राजेगांव येथील महिलांना आणावे लागते. यासाठी रोज 500 रुपये लागतात. शेतातील कामे वेळेत झाली नाही तर पिकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे नाइलाजास्तव अधिक मजुरी देऊन मजूर कामावर आणावे लागत आहेत.
– शंकरराव होले, अक्षय होले, प्रगतशील शेतकरी,स्वामी चिंचोली.
मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांमध्येच स्पर्धा
याबाबत शेतमजुरांची चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, दिवसेंदिवस महागाई वाढत असून दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, औषधपाणी यासाठी खर्च होतो. काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्येच मजूर मिळवण्यासाठी स्पर्धा लागते व त्यातच सर्व ठीकाणी शेतीकामे सुरू झाल्याने काही शेतकरी कामे झटपट उरकण्यासाठी त्यांच्याकडे कामाला येण्यासाठी जादा मजुरी देण्याचे कबूल करतात म्हणून मजुरीत वाढ होत आहे.