उत्पादन खर्च मिळत नसल्याने पिके अर्ध्यावर सोडली
पवनानगर – राज्यभर जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठे तुडूंब आहेत. आता सहज उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे यंदा बागायती क्षेत्र चांगलेच फुलले. त्यामुळे फळभाजी पिकांसह पालेभाज्यांवर शेतकरी भर देत आहेत. वाढत्या बागायती क्षेत्रामुळे बाजारात आवक वाढली आणि पर्यायाने बाजारभाव कोसळला. भरघोस उत्पन्न मिळाले खरे, मात्र बाजारभाव गडगडल्यामुळे शेतमाल अर्ध्यावर सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पवन मावळात टोमॅटो, काकडी, फरसबी अशा विविध प्रकारची फळभाज्यांची व पालेभाज्यांची लागवड केली आहे. उत्पन्न वाढल्याने शेतमालाची मोठी आवक बाजारात होताना दिसतेय. मात्र या वाढत्या उत्पनाचा शेतकऱ्यांनी फायदा होताना दिसत नाही. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे शेतात फरसीबी, काकडी, टोमॅटो अशा विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र हा शेतीमाल मुंबई किंवा पुणे येथे घाऊक बाजारात भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतमालास भाव नसल्याने उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी एका किलोस 20 ते 25 रुपयांपर्यंत घाऊक बाजारात भाव मिळत होता. मात्र यंदा 10 ते 15 रुपये मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारभावात 10 ते 15 रुपयांचा फरक आहे.
येळसे येथील शेतकरी सुनील ठाकर यांनी 30 गुंठ्यामध्ये काकडी पिकांची लागवड केली. त्यासाठी त्यांना 55 हजार रुपये खर्च आला. त्यामध्ये काकडी बांधण्यासाठी लोखंडी तार, सुतळी, लाकडे, मजुरी, औषधे, बियाणे असा खर्च आला.
शेतकऱ्याने काकडीचे तीन वेळा तोडणी केली, त्यांना 10 टक्के सुद्धा खर्च वसूल झाला नाही. 500 किलो काकडी तोडणीसाठी सरासरी 1 हजार रुपये खर्च येतो, एक हजार रुपये मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
हवामानातील बदल अन् कोसळलेला बाजारभाव…
सततच्या वातावरणातील बदलामुळे काकडी पिकावर “डावणी’ या रोगाचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे औषध फवारणी अधिक करावी लागते, तर अन्य पिकांवर मावा रोगाचा प्रादूर्भाव झालेला दिसून येत आहे. एकंदरीत शेतीमालाला बाजारभाव नाही, त्यात पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे, पिकांवर औषधाचा एक फवारणी घ्यायला साधारणतः 1 हजार रुपये खर्च येतो, असे शेतकरी सांगत आहेत.
मी फरसबी या पिकांची लागवड केली असून, बाजारभाव नसल्यामुळे माझ्या शेतातील पीक उपटून टाकले आहे. फरसीबी लागवडीसाठी सुमारे 25 हजार खर्च झाला. त्यातून 10 टक्के सुद्धा नफा मिळाला नाही आणि झालेला खर्चही वसूल झाला नाही. गेल्या वर्षी फरसीबीला बाजारभाव कमीत कमी 30 रुपये, तर अधिकाधिक 60 रुपये भाव मिळत होता. तर यावर्षी घाऊक बाजारात 8 ते दहा रुपये एवढा बाजाराभाव आहे, मात्र यातून काहीच नफा मिळाणार नसल्यामुळे फरसबीचे पीक वाया गेले आहे.
– श्रीधर जाधव, शेतकरी.
काकडी या पिकाची लागवड केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 ते 20 रुपयांचा फरक पडला आहे. घसरलेल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च मिळत नाही. आता खर्चच मिळत नसल्यामुळे काकडीची मशागत बंद केली आहे. 20 ते 25 टक्के भांडवली खर्च काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
– सुनील ठाकर, शेतकरी