शनिवार-रविवारी कोठे फिरायला जायचे का? पप्पांनी मला विचारले. अधून मधून सर्वांना घेऊन कोठे तरी पिकनिकला म्हणा, फिरायला म्हणा घेऊन बाहेरगावी जाण्याची त्यांना आवड आहे. त्यामुळे लागोपाठ दोन तीन सुट्ट्या आला की, अथवा एखाद्या शनिवार-रविवारी ते आम्हा सर्वांना घेऊन कोठे तरी बाहेरगावी जात असतात आणि ते ही एखाद्या मोठ्या अथवा प्रसिद्ध ठिकाणी नाही, तर अगदी शांत ठिकाणी. गर्दीपासून दूर दूर.
आजही त्यांनी असाच प्रश्न विचारला. तो ऐकताच माझा मुलगा ओंकार पटकन मोठ्या उत्साहाने उद्गारला, आजोबा आपण पेशवे पार्कमध्ये जायचे. पेशवे पार्क हे त्याचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. पेशवे पार्कमध्ये असलेले ऍडव्हेंचर गेम्स त्याला फार आवडतात आणि त्यांचा तो पुरेपूर आनंद घेतो. एकदा पेशवे पार्कमध्ये गेल्यानंतर पार्क बंद व्हायची वेळ होऊन तेथील गार्डस् बाहेर जायला सांगेपर्यंत काही त्याचा पाय बाहेर पडत नाही. त्याचे आजोबा त्याला महिन्यातून एकदोनदा तरी पेशवे पार्कमध्ये घेऊन जातात. जाताना त्यांना टिफिनही द्यावा लागतो. कारण तेथील ऍडव्हेंचर गेम्स खेळून तो इतका दमतो, की त्याला खूप भूक लागते आणि बाहेरचे काही खावे हे त्याच्या आजोबांना आवडत नाही. त्यामुळे त्यांना बागेत जाताना चांगला-त्यांच्या आवडीचा डबा करून द्यावा लागतो.
उप्पीट, पोहे, इडली-सांबार असे काही तरी दमदमीत. अगदी पुरी-भाजीही त्यांना आवडते. आज मात्र आजोबांनी त्याला सांगितले की, दोन दिवस सुट्टी आहे सगळ्यांना, पेशवे पार्कला आपण पुढच्या रविवारी जाऊ. आज नको. आज आपण बाहेरगावी कोठेतरी शांत ठिकाणी जाऊ. गर्दीपासून दूर दूर आणि टीव्हीपासूनसुद्धा दूर दूर. ते ही खरेच आहे. आजकाल सारे जीवनच इतके गजबजाटाचे, धावपळीचे आणि तसे पाहिले तर विनाकारणच इतके बिझी झाले आहे, माणसाला फुरसतीचे क्षण मिळणे दुर्मीळ झाले आहे. घरातील माणसांना शांतपणे एकत्र बसून जीवाभावाच्या चार गोष्टी करायला फुरसतही मिळत नाही. मुलांच्या शाळा, मोठ्यांचे नोकरी व्यवसाय आणि घरातील न संपणारी कामे आणि तो मोबाइल-स्मार्टफोन या साऱ्यात दिवस कोठे निघून जातो हे कळतही नाही.
आता टीव्हीची जागा त्या स्मार्टफोनने घेतली आहे. चॅटिंग वगैरे नसते तेव्हा टीव्हीचे कार्यक्रम नाहीतर मॅच पाहण्यात दिवसचा दिवस जातो. दिवसच का, आठवडे-महिनेही कोठे जातात हे कळत नाही. आणि नोकरी-व्यवसाय करणाऱ्या माणसांना तर प्रत्यक्ष कामापेक्षाही कामाला जाता येतानाचा शीण जास्त जाणवतो. स्वत:च्या गाडीने जा किंवा सार्वजनिक वाहनाने जा; ट्रॅफिक जॅम काही चुकत नाही. बसमध्ये माणसांची जशी गर्दी असते, माणसे नुसती भरलेली असतात आणि नवीन येतच असतात तसेच रस्त्यावरही वाहने नुसती भरलेली असतात आणि नवनवीन येत असतात, अनेकदा अगदी मुंगीच्या गतीने ट्रॅफिक असते.
आता डिसेंबर सुरू झाल्यानंतर जाणीव होते की हे वर्षही संपत आले आहे. झाले, या महिन्याचे आणि वर्षाचेही जेमतेम आठवडे राहिले आहेत. तीन आठवड्यातच सन 2020 सुरू होईल. माणसाचे जीवनही टी-20 सारखे झाले आहे. झटपट झटपट…गडबडगोंधळ-हलकल्लोळ… दर्जेदार कसोटी क्रिकेटसारखे शांत-सुखाचे जीवनही आऊटडेटेड होऊ लागले आहे. खूपदा हे सारे फास्ट लाइफ, ही सारी गर्दी खरोखरच नको वाटते. पैसा भरपूर मिळतो, पण पैशाने विकत न मिळणारे समाधान मात्र न परवडण्याइतके महाग झाले आहे. आता आम्ही कधी तरी एखाद्या लहानशा गावात पप्पांच्या मित्राकडे जाऊन गर्दीपासून दूर दूर चार दिवस राहू शकतो, पण अजून काही वर्षांनी ते तरी मिळेल का? ते म्हणतात तसे आजकाल बाहेरचे जग गजबजलेले, भरभरून वाहणारे झाले आहे आणि घरे मात्र कमी माणसे असलेली मोकळी मोकळी होऊ लागली आहेत.
अश्विनी महामुनी