शशिकांत भालेकर
पारनेर – तालुक्यातील वडनेर हवेली येथे पाणी फाउंडेशन व ग्रामस्थांच्या मेहनतीच्या माध्यमातून झालेल्या विविध पाणलोटाच्या कामां हे गाव पाणीदार गावाकडे वाटचाल करत आहे. ग्रामस्थांनी पावसाचे पाणी योग्यरितीने जमिनीत मुरविल्याने गावातील विहिरी व बोअरवेलमधून चक्क विना मोटार पाणी उपळत आहे.
वडनेर हवेली येथे यावर्षी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 40 लाख रुपयांची विविध पाणलोटाची कामे ग्रामस्थांच्या मदतीने मार्गी लागली. या कामांच्या आधारे या गावाचा राज्यात पहिल्या दहामध्ये, तर तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत स्पर्धेचे दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. झालेल्या पाणलोटाच्या कामांमुळे पडलेल्या पावसाचे पाणी योग्य रीतीने जमिनीमध्ये मुरवण्यासाठी विविध ठिकाणी डीप सिटी, सिटी नालाबांध, शेततळे, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे आदी कामे करण्यात आली.
मागील दोन वर्षांपासून गावामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाला गावकऱ्यांना सामोरे जाव लागले होते. गावामध्ये सतत पिण्यासाठी टॅंकरचे पाणी येत असे, तर कधीकधी पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत होती. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्रित येत पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभाग घेतला. जवळपास पन्नास ग्रामस्थांनी घाम गाळत पाणलोटाचे मोठे काम उभे केले. त्यामुळे या गावातील पाणीसाठ्यात वाढ झाली.पावसामुळे सर्व पाणी जमिनीत मुरल्याने गावातील विहिरी, बोरवेल, नदी-नाले तुडुंब भरले आहेत.
सर्वत्र पाणी वाहताना दिसत आहे. तरुणांनी व ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेत गाव पाणीदार केले आहे. गावातील सर्वच भागांमध्ये सीसीटी, डीपसीसीटी, विहीर पुनर्भरण, गॅबियन आदी कामे करण्यात आली. त्याचबरोबर जवळपास पंधरा मोठे, 16 छोटे नालाबांध, 15 इनलेट-आउटलेट, शेततळे अशा प्रकारची कामे करण्यात आली होती. परतीच्या पावसामुळे विहिरी, बंधारे, शेततळी तुडुंब भरली. त्यामुळे गावातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वत्र पाणी वाहताना दिसत आहे. गावाने एक लाख 16 हजार 60 घनमीटर मशिनने, तर आठ हजार 794 घनमीटर काम श्रमदानाद्वारे केले.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतात पाणी असल्यामुळे पिके वाया गेली आहेत. बरेच क्षेत्र ओलिताखाली असले, तरी शेतकरी मात्र आनंदित आहे. कारण अनेक वर्षे दुष्काळ शेतकऱ्यांनी पाहिला आहे. त्यामुळे आता असणारे पाणी पिकापेक्षा ही महत्त्वाचे असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जाते.
लोकवर्गणीतून केली 40 लाखांची कामे
उन्हाळ्यात पाणी फाउंडेशन स्पर्धेमध्ये गावाने सहभाग घेऊन श्रमदानाबरोबरच जवळपास 40 लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली. त्याद्वारे नालाबंधारे, शेततळे तयार करण्यात आली. त्यामुळे गावची पाणी साठवण क्षमता वाढली आहे. या गावात झालेल्या कामामुळे तालुक्यातील इतर गावांनी देखील प्रेरणा घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात ही गावेली दुष्काळापासून मुक्ती मिळवू शकतात.