भोर- इतिहास ज्यावेळी लिहिला जातो त्यावेळी तो पराक्रमाच्या आधारावर लिहिला जातो. असा इतिहास आवश्य वाचावा, त्यातील चुका दुरुस्त कराव्यात, मात्र त्यात आडकून राहू नये, असा सल्ला देऊन मराठ्यांचा इतिहास काही निवडक पराक्रमी घराण्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. समाजाच्या गरजा ओळखून ज्ञान प्रत्येकाने आपल्या घराण्याचा इतिहास समजून घेऊन तो आवश्य वाचावा आणि बदलत्या समाजाची आव्हाने स्वीकारल्यास सगळी ऐतिहासिक घराणी अजरामर होतील, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. राजेशिर्के प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त राजेशिर्के परिवार आणि आप्तेष्ठांच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून रामराजे बोलत होते.
यावेळी राज्याचे माजी कृषिमंत्री दादा जाधवराव, सातारचे मा. उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, रामराज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विजयराव मोहिते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवसिंह राजेशिर्के, उपाध्यक्ष निवृत्त पोलीस निरीक्षक अनंतराव राजेशिर्के, सचिव प्रदीप राजेशिर्के, अखिल भारतीय मराठी चिञपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, शिरकाई देवस्थानचे दत्ता राजेशिर्के, प्रकाश राजेशिर्के यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव प्रदीप राजेशिर्के यांनी केले. सूत्रसंचालन नितिन राजेशिर्के यांनी केले, तर अनंतराव राजेशिर्के यांनी आभार केले.