मुंबई – आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. मागील २० दिवसांपासून या प्रकरणावरून वाद सुरू आहे. आता चव्हाण कुटुंबीयांतच वाद सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पीडितेची आजी म्हणून समोर आलेल्या शांताबाई चव्हाण यांच्याविषयी सत्य समोर आल्यानंतर त्यांनी आता पूजाच्या माता-पित्यावर आरोप केले आहेत.
पूजा चव्हाणची चुलत आजी असल्याचा दावा करणाऱ्या शांताबाई चव्हाण भावकी असेल पण २५ वर्षांपासून शांताबाई आणि आमची भेट नाही की, येणं-जाणं नाही, असं पूजाच्या वडिलांनी सांगितले होतं. त्याला शांताबाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या प्रकरणात आवाज न उठवण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा दावा शांताबाई राठोड यांनी केला. तसेच पूजा चव्हाण आणि अरुण राठोड यांच्यातील संबंधांबाबतही मोठा गौप्यस्फोट शांताबाई राठोड यांनी केला.
अरुण राठोड माझ्या गावातला मुलगा आहे. माझ्या माहेरचा नातलग आहे. तो माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. मात्र अरुण राठोड हा पूजा चव्हाणचा कुणीच असून अरुणच्या विरोधात आमची काहीही तक्रार नसल्याचे शांताबाई यांनी नमूद केलं. शांताबाई चव्हाण यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. तसेच आपण पूजाची आजी असल्याचा दावा केला होता. यावरून पूजाच्या वडिलांनी शांताबाई आपली कोणीही नाही, असं म्हटलं होतं. एकूणच या प्रकरणाला वेगळ वळण मिळत की, काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.