कुरूक्षेत्र – हरियाणा सरकारने आंदोलक शेतकऱ्यांवर राज्यात खोटे खटले दाखल करण्याचे सत्र अवलंबले आहे, पण असल्या प्रकाराने शेतकऱ्यांचे आंदोलन दबणार नाहीं किंवा त्यावर कोणताहीं परिणाम होणार नाही असे किसान नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या आंदोलनात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये, शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील असे त्यांनी म्हटले आहे. हरियाणातील सरकार शेतकऱ्यांवर खोटे खटले दाखल करून किंवा त्यांना अटक करून आपल्या केंद्रातील नेत्यांना खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे.
असल्या प्रकारांचा आमच्यावर काही एक परिणाम होणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी नमूद केले. केंद्राने शेतकऱ्यांवर अघोरी अन्याय चालवला आहे. केंद्राच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांना देशद्रोही संबोधले जात आहे. पण आम्ही एकजुटीने जे आंदोलन चालवले आहे त्यात आमचा विजय निश्चीत आहे.