औरंगाबाद – औरंगाबादमध्ये शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. चंद्रकांत खैरे यांच वय झाले असून त्यांची चेकअप करण्याची गरज आहे. पराभवाच्या छायेत असल्यामुळे खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे, अशी सणसणीत चपराक हर्षवर्धन जाधव यांनी लगाविली आहे.
जाधव म्हणाले, खैरेंची बुद्धी भ्रष्ट झाल्याने ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. ज्या नेत्यांनी मदत केली असे सांगतात ते दानवे त्यांच्याच जवळचे नेते आहेत. खैरै यांना माझे आव्हान आहे की, सासऱ्यांनी मला 50 लाख दिले हे सिध्द करावे. अन् ते सिद्ध झाल्यास मी सांगेल ते करायला तयार आहे, असेही ते म्हणाले. मला ना सासू, ना सासऱ्याने मदत केली. मी रावसाहेब दानवे यांच्या जावयाच्या आधी रायभान जाधव यांचा मुलगा आहे. त्यामुळे ही निवडणूक मी स्वतःच्या जीवावर लढलो आहे, असेही त्यांनी सांगितले.
रावसाहेब दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत रसद पाठवली, असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. 50 लाख रुपये पकडले होते ते कोणाचे होते, हे हर्षवर्धन यांनी सांगावे, असेही खैरे म्हणाले होते. दानवे रोज हर्षवर्धन यांना रोज पैसे पाठवत होते. मी याचा आढावा घेतला आहे, असेही खैरे यांनी म्हटले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्मऐवजी जावई धर्म पाळला, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी त्याआधी केला होता. चंद्रकांत खैरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे तक्रार देखील केली आहे.