फेक न्यूज ही एकट्या भारताची नव्हे तर संपूर्ण जगाची डोकेदुखी होऊन बसली आहे. अफवा पसरविणे फार पूर्वीपासून सुरू असले, तरी डिजिटल तंत्रज्ञानात क्रांती झाल्यानंतर जो सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात आला आहे, त्यामुळे नुकसान होण्याच्या घटना जगभरात घडत आहेत. ही समस्या केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित नाही, तर ती एक सामाजिक आणि सुरक्षाविषयक समस्या आहे. 2015 नंतर अनेकजण खोट्या बातमीमुळे जीवाला मुकले, असे आकडेवारी सांगते. अशा स्थितीत योग्य नियमावली तयार करण्याची जितकी गरज आहे, तितकीच नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखण्याचीही गरज आहे.
फेक न्यूज : प्रश्न आहे जबाबदारीचा (भाग-१)
भारतात ट्विटर या माध्यमाचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, उजव्या विचारसरणीच्या बाजूने असणाऱ्या बातम्या डाव्या विचारसरणीच्या बाजूने असणाऱ्या बातम्यांच्या तुलनेत अधिक वेगाने पसरतात. याचे प्रमुख कारण म्हणजे, उजव्या विचारसरणीकडे अधिक सुसंघटित व्हॉट्स ऍप समूह आहेत. शेकडो-हजारो लोक या समूहांशी संलग्न असल्यामुळे अशा बातम्या कोट्यवधी लोकांपर्यंत झटकन पोहोचतात. अशा स्थितीत सत्यासत्यतेची पडताळणी जवळजवळ अशक्य होऊन बसते. शिवाय, ज्याच्या इनबॉक्समध्ये दररोज शेकडो संदेश येऊन पडतात, तो त्यापैकी कोणता खरा आणि कोणता खोटा, याची पडताळणी करण्याची मेहनत का घेईल? संबंधित सर्वेक्षणकर्त्यांनी यावर काही उपायही सुचविले आहेत. ऍप्लिकेशन मंच (उदा. व्हॉट्स ऍप वगैरे), माध्यमे, सरकार आणि सिव्हिल सोसायटी म्हणजे समाज या सर्व संबंधित घटकांनी मिळून खोट्या बातम्यांचा प्रसार रोखायला हवा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकविसाव्या शतकातील दूरचित्रवाणी वाहिन्यांमुळेही अशा बातम्या पसरण्याचा वेग अनेक पटींनी वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फेक न्यूज : प्रश्न आहे जबाबदारीचा (भाग-३)
सर्वेक्षणकर्त्यांनी सुचविलेला सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे शोधपत्रकारिता करणाऱ्यांनी खोट्या बातम्या पसरविण्यामागे कोणत्या संघटित शक्ती कार्यरत आहेत, यांचा शोध घ्यावा. सर्वांत मोठी लोकशाही मानल्या गेलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या वेळी अशा प्रकारच्या खोट्या आणि पैसे देऊन तयार केलेल्या बातम्या पसरविल्या जाण्याची शक्यता प्रचंड असते. बालाकोट येथील हवाई हल्ल्यानंतरच्या काळात अशा प्रकारच्या बातम्या हटविण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांची माहिती फेसबुकच्या भारतीय आवृत्तीचे प्रमुख तुषार बारोट यांनीच दिली आहे. “असे वातावरण यापूर्वी कधीच पाहिले नव्हते,’ असे ट्विटही त्यांनी केले आहे. खोट्या बातम्या पसरविणारी लाखो भारतीयांची खाती फेसबुककडून रोज बंद केली जात आहेत, असे सांगितले जाते. निवडणूक आयोगानेही 11 मार्चच्या पत्रकार परिषदेत अशा अनेक उपायांची घोषणा केली होती.
– एस. वाय. कुरेशी, माजी निवडणूक आयुक्त