नवी दिल्ली – करोनाविरोधी लढ्यात मोदी सरकारकडून प्रचंड गैरव्यवस्थापन सुरू असल्याचा आरोप कॉंग्रेसने शनिवारी केला. तसेच, तातडीने योग्य पाऊले उचलली न गेल्यास अभूतपूर्व आपत्ती ओढवण्याचा इशाराही देण्यात आला.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर प्रमुख नेत्यांचा सहभाग असणारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची व्हर्च्युअल बैठक संपन्न झाली. त्यानंतर एक निवेदन पत्रकार परिषदेत जारी करण्यात आले. त्यामध्ये करोना संकटाच्या हाताळणीवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. देशातील अतिशय गंभीर स्वरूपाचे संकट हाताळण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केलेली दिसत नाही. त्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागत असल्याचा खेद वाटतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले. करोना संकट हाताळण्यासाठी कॉंग्रेसच्या बैठकीत काही उपाय सुचवण्यात आले. त्या उपायांचा समावेश असणारे पत्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहेत. पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस नेत्यांनी मोदी यांनाही लक्ष्य केले. बंगालमध्ये राजकारण करण्याऐवजी मोदींनी दिल्लीत थांबायला हवे, असे ते म्हणाले.