मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि एकसंघ असल्याचे आघाडीतील तिनही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले जात असले तरी या पक्षांमधील कुरबुरी बाहेर येतच असतात. आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप करत टीकास्त्र सोडल्यामुळे कथित वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसेना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार त्रास देत असून फोडाफोडी करत आहेत असा थेट आरोप टोपे यांनी केला आहे.
शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याच्या गोष्टी खऱ्या असून त्यांनी सत्तेच्या बळावर फोडाफोडी करु नये, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार असून आघाडी सरकारचा धर्म पाळावा, असेही राजेश टोपेंनी म्हटले आहे. त्यामुळे आता अंतर्गत वाद, नाराजीमुळे सरकारवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.