मुंबई : आजपासून दोन दिवस चालणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत असून यामुळे भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई कऱण्यात आली आहे. यावरून आता राजकारण तापल असून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
विरोधी पक्षाचं संख्याबळ कमी व्हावं म्हणून आमच्या आमदारांना सस्पेंड करण्यात आलं आहे. आमचे आमदार निलंबित करण्यासाठीच सरकारच्या मंत्र्यांनीच शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्टोरी रचली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. त्यामुळे आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आमदार निलंबीत केले जातील, अशी मला शंका होती. ती खरी झाली. मात्र ओबीसींसाठी 12 काय आमच्या 106 आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही लढा देत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान आमच्या एकाही आमदाराने शिवीगाळ केली नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांना ठावूक आहे. शिवसेनेच्या सदस्यांनीच धक्काबुक्की केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. सरकार मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून फसवणूक करत असल्याचंही फडणवीसांनी नमूद केलं.