मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत शपथ सरकार स्थापनेची शपथ घेतली होती. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात एकाच खळबळ उडाली होती. दरम्यान, फडणवीसांनी त्यांच्या या निर्णयावर पश्चात्ताप व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपला पश्चाताप व्यक्त केला आहे. फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
फडणवीसांनी यावेळी बोलताना, “शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केले होते. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आले होते” असे त्यांनी म्हटले.
तसेच “आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा विचार केला याचा मला पश्चात्ताप आहे. हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असंही सारखं वाटतं. मला माहिती आहे त्यावेळी काय झालं होतं आणि कोणी काय केलं होतं” असे त्यांनी सांगितले. फडणवीसांनी आपण एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये या सर्व घटना उघड करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात फक्त सरकार असून प्रशासन नसल्याची टीका केली.
महाराष्ट्रात करोना स्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात आली नसल्याची टीका यावेळी फडणवीसांनी केली. ते म्हणाले की, “राज्य सरकारने १० हजार मृत्यू लपवले. सरकारने करोना स्थिती योग्य प्रकारे हाताळल्याचे सांगत आपली पाठ थोटपली, मात्र देशातील एकूण मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाल्याचं सत्य ते स्वीकार का करत नाहीत?”.
राज्य सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले की, “सरकार जेवढं स्थिर दिसतं, तितकंच ते कोसळण्याची शक्यता अधिक असते”. यावेळी त्यांनी हे सरकार आपल्याच वजनाने खाली येईल असा पुनरुच्चार केला.