मुंबई – महाविकास आघाडीचा प्रयोग होण्यापूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेला शपथविधी आजही चर्चेत आहे.पहाटेचा शपथविधी म्हणून देखील हा प्रसंग चर्चेत आहे.आता या शपथविधीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. हा शपथविधी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट होती. अशात भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आजही अधूनमधून राज्याच्या राजकारणात शपथविधीची चर्चा होताना दिसून येते. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी निवडणूक आमच्यासोबत लढवली परंतु त्यानंतर आमचा विश्वासघात केला असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा चर्चेत आणला आहे.
मुनगंटीवार म्हणाले,”भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार तयार झाले. आम्हालाही उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा होता. कारण त्यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे असं समजून तो शपथविधी झाला.” असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना पुन्हा माघारी आणत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने सरकार स्थापन करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले. मात्र अद्याप त्या पहाटेच्या शपथविधीचे पूर्ण सत्य समोर आलेलं नसल्यामुळे अनेकदा यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसतात.