मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचा कोकण दौरा करत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे.
वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आज (बुधवार) रायगड, उद्या रत्नागिरी, तर परवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली होती. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तेव्हाही फडणवीसांनी कोकण दौरा करत नुकसानाची पाहणी केली होती.
त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणाचा दौरा केला होता. तेव्हा ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली होती.
‘गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी मंत्र्यांकडून मदतीची वक्तव्य येऊ लागली आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. प्रत्येक वेळेस केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही. राज्य सरकार म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही, असा सवालही दरेकरांनी विचारला.
तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. वादळामुळे विजेचे 80 टक्के खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसळले आहेत.
अशावेळी प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोरोना रुग्णांसाठी योग्य उपाययोजना केल्याचं दिसून आलं आहे. चक्रीवादळाचा इशारा आधीच मिळाल्यामुळे प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. वीज गेली तर कोरोना रुग्णांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये जनरेटरची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे वादळाच्या तडाख्यात बत्ती गुल झाली असली तरी कोरोना रुग्णालयातील वीज सुरु आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350, खेड तालुक्यात 30, गुहागर 05, चिपळूण 65, संगमेश्वर 102, रत्नागिरी 200, राजापूर 32 असे मिळून एकूण 1 हजार 28 घरांचं नुकसान झालंय. तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
या चक्रीवादळामध्ये गुहागरमध्ये 1, संगमेश्वरात 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 नागरिक जखमी झाले. गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वरात 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्या, 09 शाळा, तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झालं आहे.