मुंबई – करोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी देशभर लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यात आगामी 20 एप्रिलपासून केंद्र सरकारने विविध प्रकारची सूट दिली आहे. प्रसार आणि प्रसिद्धी माध्यमे तर आधीपासूनच अत्यावश्यक सेवेत आहेत. केंद्र सरकारने 20 एप्रिलपासून सूट देण्यासाठी जी अधिसूचना काढली आहे. त्यात देखील टिव्ही, डिजीटल माध्यमे आणि वृत्तपत्रांना वगळले आहे.
मात्र आता त्या संदर्भातील दुरुस्तीपत्र जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये वृत्तपत्रांची छपाई केली जाऊ शकेल, मात्र हॉकर्समार्फत घरोघरी वितरण करता येणार नाही, असे म्हटले आहे. घरोघरी वितरण करता येणार नसल्याचे वृत्तपत्र छपाईचा मूळ उद्देशच सफल होणार नाही. आजच्या “फेकन्यूज’च्या काळात वृत्तपत्रांचे महत्व लक्षात घेतले पाहिजे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा वृत्तपत्रे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वृत्तपत्र वितरण बंदीच्या धोरणाचा फेरविचार करण्यात यावा, अशी विनंती माजी मुख्य्मंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.