मुंबई – मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटते आहे, असे विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर कॉंग्रेसने आज त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी एके ठिकाणी बोलताना असे नमूद केले होते की, जनतेने मला कधी मी मुख्यमंत्री नसल्याचे जाणवू दिलेले नाही. मी कोणत्या पदावर सध्या काम करतो आहे यावर लक्ष न देता जनतेने मला पहिल्यासारखेच प्रेम दिल्याने मला आजही आपण मुख्यमंत्रीच आहोत असे वाटते आहे, असे फडणवीस म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर निशाणा साधताना कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे की, फडणवीस अजूनही स्वप्नातून बाहेर यायला तयार नाहीत. त्यांचा पहाटेचा प्रयोगही फसला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या अनेक तारखा त्यांनी ज्योतिषांकडून जाणून घेतल्या व त्या संबंधात त्यांनी तशा घोषणाही केल्या, पण अजून ना ते सरकार पाडू शकले आहेत ना त्यांना पुन्हा सत्ता स्थापन करता आली आहे.
तरीही साहेबांचे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे सुरूच आहे. पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीसाठी ही स्थिती हास्यास्पद आहे, असा टोमणाही लोंढे यांनी मारला आहे.