नवी दिल्ली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना पक्षाचे बिहार निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे.
मागील काही आठवड्यांपासून फडणवीस बिहार निवडणुकीसंदर्भात होणाऱ्या भाजपच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. त्याशिवाय, त्यांनी बिहारला भेटही दिली.
आता फडणवीस यांच्यावर थेट निवडणूक प्रभारीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमधील भाजपच्या प्रचार रणनीतीबाबतची उत्सुकता वाढली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम याआधीच जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी त्या राज्यात तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. बिहारमध्ये जेडीयू, भाजप आणि लोजपचा समावेश असणारी एनडीए सत्तेवर आहे.
सत्तारूढ आघाडीपुढे निवडणुकीत प्रामुख्याने राजद, कॉंग्रेस आणि लहान पक्षांचा समावेश असणाऱ्या विरोधकांच्या महाआघाडीचे आव्हान असेल.