मुंबई – राज्यात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. मात्र संकटाच्या काळातही राजकारण जोरात सुरू आहे. विरोधी पक्षांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून सत्ता नसल्याने फडणवीस पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफडत असल्याचं ते म्हणाले.
फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत, असं म्हणत खडसे म्हणाले सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं त्यांना रात्री बेरात्री पण स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत. फडणवीस ब्राम्हण असल्याने त्यांचं भाकीत खरं ठरेल असं मला वाटत होतं. मात्र त्यांचं कोणतही भाकीत खरं ठरलेले नाही, असं खडसे म्हणाले. जळगाव येथे आयोजित रक्तदान शिबीरात ते बोलत होते.
दरम्यान मीदेखील राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. पण संकटाच्या काळात कधीही कुत्र्या-मांजरी सारखे खेळ खेळलो नाही असं खडसे म्हणाले. महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला, मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशावेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केल्याचे खडसेंनी सांगितलं.