मुंबई : मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचा मला तिकीट न देण्यामागे हात होता आसा गंभीर आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बुधवारी बोलत होते.
खडसे म्हणाले की, काही लोकांना माझी राजकीय कारकीर्द संपवायची आहे. भाजपच्या राज्य कोअर कमिटीच्या सदस्यांनी मला सांगितले की, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून मला देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी तिकीट देण्यास विरोध केला होता.
भाजपच्या केंद्रीय समितीच्या मला उमेदवारी देण्याच्या शिफारशींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. कोअर कमिटीच्या सदस्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मला माहिती दिली.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात खडसे महसूल मंत्री असताना जमीन घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी खडसे यांनी 2016 मध्ये महसूलमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना तिकीट दिले नव्हते. खडसेंऐवजी भाजपाने त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. शिवसेनेचे बंडखोर नेते चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा दारुण पराभव केला होता .
पुढे खडसे म्हणाले आतापर्यंतच्या सर्व घडामोडींकडे पाहिल्यानंतर मला असे दिसते की, काही लोक माझ्या विरोधात आहेत. ते माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात भाजपने अशा लोकांना उमेदवारी दिली ज्यांना जनतेचा पाठिंबा नव्हता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारासाठी फारच क्वचितच मला बोलावले गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला.