मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यात औरंगाबाद महापालिका निवडणूकही जवळ आली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराची मागणी जोर धरत आहे. मात्र नामांतराचा मुद्दा समोर करून काँग्रेस आणि शिवसेनेचे नाटक सुरू असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे निव्वळ नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना पक्षांकडून हे ठरवून करण्यात येत आहे. शिवसेना आता औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करा असं म्हणत आहे. यामुळे शिवसेनेचे मतदार खुश होतील. तर काँग्रेस याला विरोध करते. यामुळे काँग्रेसचे मतदार खुश होतील. निवडणुकीच्या तोंडावर उभय पक्षांमध्ये नुरा कुस्ती सुरू असल्याची खोचक टीका फडणवीस यांनी केली. अर्थात दोन्ही पक्षांना नामांतराहून काहीही घेणं-देणं नाही. हे त्यांचं नाटक असल्याचे ते पुढे म्हणाले.
औरंगाबादमध्ये शिवसेनेला इतके वर्षे सत्ता चालवून देखील, कोणतही महत्वाचं कार्य करता न आल्याने आता अशाप्रकारची भाषा सुरू आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हे सर्व सुरू आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री असताना औरंगाबादला दिलेल्या निधीची माहिती दिली. मात्र तेथील महापालिकेला काम करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्यावरून सध्या राजकीय वाद पेटला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर औरंगाबाद महापालिकेत सत्ता दिल्यास पहिल्याच दिवशी नामांतराचा प्रस्ताव संमत करण्याचे आश्वासन दिले. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शवत पुण्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे.