विजय वडेट्टीवार : कायदा हा सर्वांना समान
पुणे – 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी नागपुरातील न्यायालयाने फडणवीसांना 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी 30 मार्चला होणार आहे. मात्र, उमेदवारी अर्जात गुन्ह्यांची माहिती लपविणे, हादेखील गुन्हाच आहे, असे मत बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
“सारथी’च्या आढावा बैठकीला उपस्थित राहण्याकरिता ते गुरुवारी (दि.20) पुण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी भाजपवर निशाना साधला. याबाबत ते म्हणाले, कायदा हा सर्वांना समान आहे. कायद्यातील तरतुदी तोंड बघून राबविल्या जात नाहीत. शेवटी काही गोष्टी लपविल्या गेल्या असतील तर, तो सिद्ध करण्याचा कोर्टाला अधिकार आहे. देवेंद्रजी हे सुसंस्कृत राजकीय नेते आहेत. काही गोष्टी चुकून झाल्या असतील तर मला माहीत नाही; पण अशा गोष्टी चुकूनही होता कामा नयेत. आम्ही इतके वर्षे झाली निवडणूक लढवितो, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आम्ही महिनाभर आगोदरच तयारी करतो. त्यामुळे कोणताही फौजदारी गुन्हा लपविणे हा गुन्हाच आहे.
मागील सरकारमधील भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात विचारले असता, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात जवळपास 15 मंत्र्यांना क्लिनचीट दिली आहे. त्यांची चौकशी होण्याची आवश्यकता होती. मात्र, चौकशीच करायची नाही, ही मागील सरकारची भूमिका होती. जर दोषी असतील तर कारवाई झाली पाहिजे होती. जर निर्दोष असतील तर लोकांपुढे निर्दोष होऊन जा. मात्र आरोप असलेल्या मंत्र्यांची चौकशी व्हावी, अशी आमची भूमिका आहे. निर्दोष असतील तर घाबरण्याचे कारण नाही. त्यांनी चौकशीला सामोरे जावे. “दूध का दूध और पानी का पानी’. मात्र, खडसे यांना क्लिनचीट देणार का यावर मात्र, आम्ही हे काम करणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले.
26/11 च्या हल्ल्याच्या फेरचौकशीची मागणीवरून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. एल्गार एनआयएकडे तर कोरगाव भीमा दंगलीची चौकशी एसआयटी करत आहे. 26/11 च्या हल्ल्याची फेरचौकशीची मागणी भाजप करत आहे. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर होता. त्यावेळी का केली नाही, असा सवाल उपस्थित करत भाजपची ही दुटप्पी भूमिका सोयीनुसार असते, असा आरोप त्यांनी केला. आतापर्यंत भाजप पदाधिकारी झोपले होते का? अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली. तर कोरेगाव भीमाची एसआयटीमार्फत होणाऱ्या चौकशीची माहिती देणाऱ्या राज्यातील नारद मुनीचा आम्ही शोध घेत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.