मुंबई, – मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी आक्रमक पद्धतीने फडणवीसांवर तोफ डागल्याने विधानसभेत आज जोरदार गदारोळ झाला.
भास्कर जाधव म्हणाले की अर्णव गोस्वामी आरोपी असलेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास देवेंद्र फडणवीस सरकारने दाबून ठेवला होता. पण त्या प्रकरणाची आमच्या सरकारने चौकशी सुरू केली. त्याचा तपास सचिन वाझे यांच्याकडे देण्यात आल्यानेच फडणवीस यांनी वाझे यांच्यावर आरोप करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे असा दावा भास्कर जाधव यांनी केला.
सचिन वाझे यांनी अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या घरातून उचलून आणले याचाही राग भाजपच्या नेत्यांना आहे. सचिन वाझे या पदावर राहिले तर माजी मुख्यमंत्री फडणवीस अडचणीत येतील त्यांच्यासह अन्यही काही जण गोत्यात येतील म्हणून त्यांचा वाझे यांच्यावर राग आहे असे जाधव यांनी सांगितले. त्यावर फडणवीस यांनी तुम्ही मला धमक्या देऊ नका मी तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही असे जाधव यांना सुनावले.