कारशेड विरोधकांचे मनसुबे वेगळे असल्याची टीका
मंबई : आरेच्या जागेतील कारशेडला विरोध करणाऱ्यांचे मनसुबे वेगळे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केल्याने शिवसेना भाजप युतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, आम्हालाही युतीची चिंता आहे, असे सांगत युतीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले.
राज्यात भारतीय जनता पक्षाचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील असे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीच्या विषयाला बगल देत जाहीर केले. शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात मातोश्रीची पायरी चढणाऱ्या अमित शहा यांनी रविवारी मुंबईत शिवसेना आणि युतीच्या विषयाला स्पर्शही केला नाही. त्यातच आरे कारशेडबाबात पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरे कार शेडला विरोध करणाऱ्यांचे मनसुबे वेगळे आहेत, असे सांगितले. नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णयही लवकरच घेतला जाईल असे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मागणी सातत्याने आपल्या देशातील अर्थतज्ज्ञही करत होते. ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी ट्रेड वॉरचा ट्रिपल डाऊन इफेक्ट भारताला परवडण्यासारखा नाही. सरकारने टॅक्स कमी करण्याची हिम्मत दाखवली. या निर्णयाचा महाराष्ट्राला मोठा फायदा आहे. गेल्या वर्षांत जागतिक कंपन्या महाराष्ट्रात आल्या. अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरमुळे भारतातील गुंतवणूक वाढत असून त्याचा सर्वात मोठा फायदा राज्याला होईल.
भारतीय रिझर्व बॅंकेने रेपो रेट कमी केल्यानंतर पहिल्यांदा सरकारने निर्णय घेतला की रेपो रेट कमी झाल्यानंतर ग्राहकालाही त्याचा थेट फायदा व्हावा. हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याबरोबरच, हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली गेल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची कर्ज देण्याची क्षमता लाख कोटींनी वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय, बॅंकांचे बॅंकांमध्ये विलिनीकरण करण्याचाही केंद्राचा मोठा निर्णय असून यामुळे बॅंकांच्या तोट्यात घट होऊन नफा वाढणार असल्याचेही ते म्हणाले.