नवी दिल्ली – फेसबुक, व्हॉटस्ऍप आणि इन्स्टाग्राम या आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची सेवा सोमवारी रात्री अचानकपणे ठप्प झाली. भारतासह जगभरातील सोशल मीडिया युजर्सना तो अनुभव आला. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला.
संबंधित प्लॅटफॉर्म्स डाऊन झाल्याची तातडीने दखल घेत फेसबुकने आपल्या वेबसाईटवरून दिलगिरी व्यक्त केली. तसेच, लवकरात लवकर त्रुटी दूर करण्याची ग्वाही दिली. फेसबुककडेच व्हॉटस्ऍप आणि इन्स्टाग्रामची मालकी आहे. ते तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जगभरात लोकप्रिय आहेत.
त्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करणाऱ्यांच्या संख्येबाबत भारताचा आघाडीच्या देशांमध्ये समावेश आहे. त्यामुळे ते प्लॅटफॉर्म्स डाऊन झाल्यानंतर भारतातील युजर्सचा भ्रमनिरास झाला. अनेकांना मेजेसची देवघेव करण्यात अनेक अडचणी आल्या.