नवी दिल्ली – फेसबुक राजकीय पक्षपातीपणा करत असल्याचा आणि भारतीय लोकशाही प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा कॉंग्रेस पक्षाचा दावा फेसबुकने आज फेटाळून लावला. फेसबुक कधीही पक्षपातीपणा करत नाही. नागरिकांना मोकळेपणाने आपली मते व्यक्त करता यावीत, यासाठी फेसबुक द्वेष आणि कट्टरतावादाचा निषेधच करत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
सार्वजनिक धोरण, विश्वासार्हता आणि सुरक्षिततेसंदर्भात फेसबुकच्या धोरणांवर कॉंग्रेसने शंका उपस्थित केली होती. त्यावर फेसबुकचे संचालक नील पॉटस यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे. कॉंग्रेसने केलेल्या आरोपांची गांभीर्याने दखल घेतली असून यापुढेही फेसबुक निःपक्ष आणि प्रामाणिक राहिल याकडेच लक्ष दिले जाईल, असे पॉटस यांनी म्हटले आहे.
द्वेषभावना पसरवणाऱ्या भाषणांच्या धोरणासंदर्भात भाजपच्या सदस्यांबाबत सौम्य धोरण अवलंबत असून भारतीय लोकशाही प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. या संदर्भात कॉंग्रेसने फेसबुकचे कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहीले होते.
वॉल स्ट्रीट जर्नल आणि टाईम मासिकात फेसबुक आणि व्हॉट्स ऍपकडून भारतातील नेतृत्वाबाबत पक्षपातीपणा आणि भाजपला झुकते माप दिल्याचा अहवाल प्रसिद्ध केल्यावर कॉंग्रेसने हा आक्षेप घेतला होता.