गुरुग्राम : फेसबुकवर झालेली ओळख दिल्लीकर तरुणीला चांगलीच महागात पडली. ऑनलाईन प्रपोज करत तरुणीच्या फेसबुक फ्रेण्डने तिला आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं. मात्र भुलवून जंगलात नेत तरुणासह 25 मित्रांकडून गँगरेप करण्यात आला. अखेर नऊ दिवसांनी हिंमत करुन पीडितेने 3 मेच्या रात्रीपासून आपल्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांना पोलिसांसमोर वाचा फोडली.
पीडित तरुणी दिल्लीत चार वर्षांपासून घरकाम करते. जानेवारी महिन्यात फेसबुकवर तिची ओळख सागर नावाच्या 23 वर्षीय तरुणाशी झाली. गप्पा वाढल्या आणि दोघांनी एकमेकांचे फोन नंबर एक्स्चेंज केले. मैत्री वाढली आणि एके दिवशी सागरने तिला थेट लग्नाची मागणी घातली. हरियाणातील होडाल शहरात राहणाऱ्या सागरने तिला आपल्या आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं.
3 मे रोजी पीडिता दिल्लीहून होडालला गेली. मात्र घरी पालकांना भेटवण्यास नेण्याऐवजी सागरने तिला रामगड गावातील जंगलात नेलं. तिथे सागरचा भाऊ आणि काही मित्र मद्यपान करत बसले होते. पीडितेला पाहून आरोपींनी तिला मधोमध खेचले. त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. रात्रीपासून पुढच्या सकाळपर्यंत जवळपास वीस जणांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडितेवरील अत्याचारांची मालिका एवढ्यावर थांबली नाही. दुसऱ्या दिवशी आरोपींनी तिला आकाश नावाच्या भंगार विक्रेत्याकडे नेले. तिथे तिच्यावर पाच जणांनी गँगरेप केला. सततच्या अत्याचारांनी तिची प्रकृती खालावत गेली. तेव्हा बदरपूरच्या सीमेवर तिला टाकून आरोपींनी पळ काढला. अखेर नऊ दिवसांनी हिंमत करुन पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली.