– हेमंत महाजन
चीन भारताच्या विरुद्ध 365 दिवस हायब्रीड वॉर किंवा अनरिस्ट्रिक्टटेड वॉर किंवा कुठलेही नियम नसलेले युद्ध लढत आहे. त्यामधला एक पैलू आहे, पाण्याचा भारताविरुद्ध एक शस्त्र म्हणून वापर.
चीनने आतापर्यंत ब्रह्मपुत्रेवर 6 धरणे बांधलेली आहेत. याशिवाय 28 अजून नवीन धरणे बांधण्याकरता प्रस्ताव चिनी सरकारसमोर आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर जर मोठे धरण बांधले तर त्यामुळे ब्रह्मपुत्रेत येणारे पाणी चीनला कंट्रोल करता येईल. चीन पाण्याचा वापर एक शस्त्र म्हणून अनेक वर्षे करत आहे. 15 जून 2020 मध्ये गलवान नदीमध्ये झालेल्या संघर्षामध्ये चीनने नदीचे पाणी हे काही काळाकरता थांबवले होते.
ग्रेट बेंड नावाच्या एका शिखराजवळ ब्रह्मपुत्रा नदी वळण घेते आणि भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. तिथे नैसर्गिकरित्या एक मोठी घळ निर्माण होते. ही घळ 320 किलोमीटर लांब आणि पाच किलोमीटर रूंद आहे. येथे जगातील सर्वात मोठे मेकॉंग धरण बांधले जाणार आहे. धरण भारतीय सीमेपासून केवळ 330 किलोमीटर दूर आहे.
एवढे प्रचंड धरण जर बांधलं गेलं तर, यामुळे ईशान्य भारताची अन्नसुरक्षा आणि पाणी सुरक्षा धोक्यात येईल. याशिवाय या धरणांमध्ये प्रचंड पाणी साठवले जाईल, ज्याचा वापर चीन एक शस्त्र म्हणून करू शकतो. या लेखामध्ये या प्रचंड धरणामध्ये साठलेल्या पाण्याचा चीन कसा शस्त्र म्हणून वापर करू शकतो यावरतीच आपले लक्ष केंद्रित करू या.
चीन या आधीसुद्धा हे शस्त्र कसे वापरत होता, याची माहिती भारतीयांना मिळणे गरजेचे आहे आणि त्यानंतर देशाने हे जलयुद्ध जिंकण्याकरता काय करायला पाहिजे यावर आपण विचार करू.
चीनचे भारताविरुद्ध जलयुद्धाचे काही उदाहरणे पाहूया.
उदाहरण एक – सतलज नदी सिंधू नदीची एक उपनदी आहे. ती तिबेटमधून हिमाचल प्रदेशच्या किनवट जिल्ह्यात येते. 1 ऑगस्ट 2000, दुपारी दीड वाजता, 50 फूट एवढा मोठा पाण्याचा लोट अचानक पारी चू या उपनदीतून सतलजमध्ये तिबेटमधून आला. किनवट, शिमला, मंडी हे जिल्हे जे नदीच्या आजूबाजूला आहेत यामध्ये शंभरहून जास्त नागरिक वाहून गेले.
120 किलोमीटर हिंदुस्थान-तिबेट हा महत्त्वाचा रस्ता वाहून गेला. 98 वेगवेगळ्या प्रकारचे नद्यांवरती असलेले पूल पूर्णपणे वाहून गेले. म्हणजे अचानक आलेल्या पुरामुळे आपले प्रचंड नुकसान झाले. सव्वापाच वाजेपर्यंत हे पाणी धरणामध्ये पोहोचले आणि सतलज नदीची पातळी काही क्षणांमध्ये 15 मीटर एवढी वाढली.
उदाहरण दोन – 11 जून, 2000 रोजी अरुणाचल प्रदेशात अचानक सियांग नदीची पातळी 100 ते 120 फूट एवढी वरती गेली. 26 माणसे वाहून गेली, तीन मोठे पूल यामध्ये वाहून गेले आणि या नदीच्या आजूबाजूला असलेल्या चार जिल्ह्यांना पुष्कळ नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो यांच्या सॅटेलाइट्सनी जी माहिती समोर आणली,
त्यामध्ये असे दिसले की तिबेटमध्ये प्रचंड मोठे तलाव निर्माण झाले होते आणि अचानक त्या तलावातले पाणी भारतामध्ये सोडण्यात आले आणि हा मोठा पूर भारतामध्ये आला.
उदाहरण तीन – 2004 मध्ये पारिचू या सतलजच्या उपनदीवरती एक मोठे तळे/सरोवर/जलाशय निर्माण झाले होते. चीन याविषयी कुठलीही माहिती देण्याकरता तयार नव्हता आणि हे पाणी अचानक सोडण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशमध्ये मोठे नुकसान झाले.
उदाहरण चार – 2012 मध्येसुद्धा अरुणाचलच्या मैदानी भागात, पासीघाट गावात, सियांग नदीचे पाणी काही वेळ पूर्णपणे थांबले. त्यानंतर काही वेळामध्ये प्रचंड वेगाने पाणी येऊ लागलेत. यामुळे पासीघाटमध्ये पाणी पसरले म्हणजेच पाणी काही काळाकरता थांबवले गेले आणि अचानक पाणी सोडण्यात आले होते.
उदाहरण पाच – 2017 मध्ये सियांग नदीचे पाणी एकदम काळे झाले आणि 10 इंचाहून जास्त माती नदीपात्राच्या दोन्ही बाजूला दिसून आली. हे पाणी पिण्याच्या किंवा जनावरांनी वापर करण्याच्या लायकीचे नव्हते. त्यामुळे तिथल्या शेतीवरती प्रचंड परिणाम झाला. मच्छीमारी पूर्णपणे थांबली. त्यावेळेला चीनने दावा केला होता की, तिथे झालेल्या भूकंपामुळे हे असे झाले असावे, जे पूर्णपणे असत्य होते.
चीनने भारताला ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी वाहण्याविषयी माहिती देणे त्यांना बंधनकारक होते. ती माहिती देणे अनेक वेळा पूर्णपणे थांबवले. असाच प्रकार ज्या वेळेला डोकलाममध्ये चीनची दादागिरी सुरू होती त्या वेळेला पण झाला.
धरणाचा ईशान्य भारतावर परिणाम
जर ग्रेट बेन्ड या ठिकाणी चीनने जगातले सर्वात महाकाय धरण निर्माण केले, तर त्याचा ईशान्य भारतावरती काय परिणाम होईल? नदीचे पाणी जर अडवले तर पावसाळ्यानंतर भारतात येणारे पाणी पुष्कळ कमी होईल आणि भारताची पाणी सुरक्षा ही नक्कीच धोक्यात येईल.
भारताने काय करावे
भारताने काय पावले उचलावी? अर्थातच भारताने, साउथ ईस्ट एशियाचे देश आणि बांगलादेश यांच्या मदतीने चीनने पाणी थांबवण्याबाबत जागतिक कोर्टात जाणे गरजेचे आहे. ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावरती या नदीच्या वरच्या भागातल्या आणि खालच्या भागातल्या देशांचा बरोबरचा अधिकार आहे. याच शिवाय या प्रश्नाला युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कौन्सिलमध्येसुद्धा उठवले जावे.
युद्ध काळामध्ये ही धरणे भारतीय लष्कराला सर्जिकल स्ट्राइक करण्याकरता अतिशय चांगली टार्गेट होऊ शकतील. आपण ब्रह्मपुत्रा नदीच्या भारतातील उपनद्यांवरती धरणे बांधून बिन पावसाळी काळामध्ये लागणाऱ्या पाण्याची गरज काही प्रमाणामध्ये पूर्ण करू शकतो. परंतु चीनला वठणीवर आणणे,
हे ईशान्य भारताच्या पाणी सुरक्षा आणि अन्नसुरक्षेचे करता तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याकरता चीन विरुद्ध एकत्रित लढाई करून भारताच्या सर्व समावेशक राष्ट्रीय ताकदीचा वापर करून चीनला अशी धरणे न बांधण्याकरता भाग पाडणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.