वारीस पठाणांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून निषेध; भाजप-एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू!
मुंबई: एमआयएम आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एमआयएम भाजपच्या इशाऱ्यावर धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवते, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. कट्टरता ही कोणत्याही धर्माची असली तरी ती देशासाठी घातकच आहे. त्यामुळे देशाचे संविधानाचे रक्षण करायचे असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर या देशात द्वेष पसरवण्याचे या दोन्ही शक्तींचे कट कारस्थान मोडून काढले पाहिजे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
एमआयएम नेते आमदार वारीस पठाण यांनी गुरुवारी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून सचिन सावंत म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट, भाजप खासदार परवेश वर्मा, गिरीराज सिंग इत्यादी भाजप नेत्यांनी ध्रुवीकरणाचा अजेंडा घेऊन जाणिवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे पाहायला मिळते. वारीस पठाण यांचे वक्तव्य ही याच उद्देशाने केलेले आणि याच पठडीतले आहे. यामागील अजेंडा ही या दोन्ही पक्षांनी मिळून एकत्रित तयार केलेला आहे.
देशातील सामाजिक एकता, धर्मनिरपेक्षतेचा संविधानाने बळकट केलेला पाया कमजोर करण्याचा यामागे उद्देश आहे. याच मार्गाने देशाची फाळणी झाली होती. त्यावेळेस देशातील वातावरण गढूळ करण्याकरिता मुस्लीम लीग, हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीन शक्ती अशाच प्रकारे एकत्रित काम करत होत्या. एकमेकांच्या विरोधाचे नाटक करून हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग एकत्र सत्तेत सहभागीही झाल्या होत्या.
“चले जाव’ आंदोलनाचा विरोध करून यांनी ब्रिटिशांना साथ दिली आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांतही मांडला हे ऐतिहासिक सत्य आहे. आज त्यांची जागा भाजप व एमआयएमने घेतली आहे, असा आरोप करत देशाचे, संविधानाचे रक्षण करायचे असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर या देशात द्वेष पसरवण्याचे या दोन्ही शक्तींचे कट कारस्थान मोडून काढले पाहिजे, असेही सावंत म्हणाले.